मराठा आंदोलकांची गर्दी, नवी मुंबईत 6 किमी वाहनांच्या रांगा, मुंबईत रस्ते बंद

मुंबई : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वाशीपर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येनं समर्थक आणि कार्यकर्ते दाखल झाले आहेत. मी रिकाम्या हाताने जाणार नाही.
मुंबईत आझाद मैदानावर येऊन आंदोलन करण्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर वेगवेगळ्या कोपऱ्यातून मराठा आरक्षणासाठी समर्थक मुंबईत येत आहे.
मुंबईत काही समर्थक आझाद मैदानावर पोहोचले आहेत, तर काही समर्थकांनी रस्त्यांवर गर्दी केली आहे. सीएसएमटी स्थानकात सुरक्षा वाढवली आहे. तर काही ठिकाणी रस्ते बंद देखील करण्यात आले आहेत.
दुसरीकडे नवी मुंबई अनेक ठिकाणी या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाशीहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर 2 तासांपासून वाहनांच्या रांगा आहेत. काही ठिकाणी 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळात आहे.
सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना वाशीमध्येच आंदोलन संपवण्याची विनंती केली आहे. जरांगे पाटील आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबईत काही ठिकाणी पोलिसांनी वाहतूक सध्या बंद केली आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी वाहतुकीचे अपडेट पाहूनच बाहेर पडा.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
माझं उपोषण ११ वाजताच सुरू झालंय. आता रिकाम्या हातानं परत जाणार नाही. सरकारनं काही कागदपत्र दिली आहेत, ती कागदपत्रे वाचून दाखवणार आहे. लोकांपर्यंत खरा संदेश जाण गरजेचं असल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आपण आपली भूमिका आज दुपारी दोन वाजता मांडणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मराठा आरक्षणावर तोडगा काढता आला नाही. त्यामुळे 24 डिसेंबरच्या एक दिवस आधीच 23 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये इशारा सभा घेतली होती. या सभेमध्येच त्यांनी 20 जानेवारीला अंतरवालीसराठीमधून मुंबईच्या दिशेन निघणार असल्याची घोषणा केली होती. आता हा मोर्चा वाशीमध्ये पोहोचला आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील हे आज दोन वाजता सभेमध्ये आपली भूमिका मांडणार आहेत.