अतिरेक्यांनी केला आर्मी ट्रकवर हल्ला, 5 जवान शहीद…

काश्मीरमध्ये लष्कराच्या ट्रकवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी नवा खुलासा झाला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात जखमी झालेल्या एका जवानाने 7 अतिरेक्यांनी रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने हल्ला केल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, काश्मीरमध्ये लष्कराी जवानांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) व 8 सदस्यीय न्यायवैद्यक पथक पुंछला रवाना झाले आहे. ते लवकरच घटनास्थळी म्हणजे भीमबेर गली भागात पोहोचतील. बॉम्बनाशक पथक व स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) पथकाने सकाळपासूनच येथील तपास सुरू केला आहे. घटनास्थळ पुंछपासून 90 किमी अंतरावर आहे.
दुसरीकडे, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी या हल्ल्यात राष्ट्रीय रायफल्स यूनिटचे 5 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने (PAFF) घेतली आहे. लष्कराने गुरुवारी दुपारी ही घटना एक अपघात असल्याचे स्पष्ट केले. पण सायंकाळी 6.33 वा. हा अतिरेकी हल्ला असल्याची पुष्टी केली.
हल्ला दुपारी 3 वा. राजौरी सेक्टरमध्य झाला. तेव्हा लष्कराची 3 वाहने सैनिकांना घेऊन राजौरी -पुंछ राष्ट्रीय महामार्गावरून भीमबेर गलीहून पुंछच्या दिशेने जात होती. मुसळधार पाऊस व कमी दृश्यमानतेचा फायदा घेऊन अतिरेक्यांनी घात लावून 1 वाहन घेरले. त्यानंतर ग्रेनेड फेकले व जवळपास 50 फेरी गोळीबार केला. यामुळे ट्रकला आग लागली.
कोण आहे PAFF… कलम 370 हटवल्यानंतर नाव आले होते उजेडात
पीपल्स अँटी-फॅसिस्ट फ्रंट पाक पुरस्कृत अतिरेकी संघटना जैश ए मोहम्मद समर्थक संघटना आहे. कलम 370 रद्दबातल झाल्यानंतर PAFF चे नाव उजेडात येणे सुरू झाले. ही संघटना अल-कायदाचा निष्ठावंत मानला जाणारा अन्सार गजवत-उल-हिंदचा मारला गेलेला कमांडर झाकीर मुसा याच्याकडून ही संघटना प्रेरित आहे.
ओडिशा व पंजाबचे होते शहीद जवान
लान्स नायक देवाशीष बसवाल, लान्स नायक कुलवंत सिंग, शिपाई हरकिशन सिंग, शिपाई सेवक सिंग व हवालदार मनदीप सिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत. यातील लान्स नायक देवाशीष बसवाल ओडिशाचे असून, उर्वरित 4 शहीद पंजाबचे आहेत.
संरक्षण तज्ज्ञ म्हणाले – G-20 च्या पर्यटन बैठकीमुळे पाकने केला हल्ला
संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल (निवृत्त) पी के सहगल यांनी सतर्कतेच्या अभावामुळे हा हल्ला झाल्याचा दावा केला. ते म्हणाले, ‘खराब हवामान, पाऊस, धुके असताना असे हल्ले होऊ शकतात ही प्रमाणित कार्यपद्धती आहे. राष्ट्रीय रायफल्सचे सैनिक उच्च दर्जाचे ट्रेंड आहेत. हल्ला होण्याची शक्यता ग्रहित धरून त्यांच्या कंपनीने सतर्क राहण्याची गरज होती. पाकने सतर्कतेच्या अभावाचा फायदा उठवला आणि हा हल्ला झाला.’
यंदाचा दुसरा हल्ला, हेतू जी-20 बैठक उधळवू लावणे
श्रीनगरमध्ये 22 ते 24 मेपर्यंत G-20 च्या पर्यटन कार्यगटाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या तयारीला खीळ घालण्यासाठी अतिरेक्यांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गत 1 जानेवारी रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. राजौरीतील डांगरी गावात झालेल्या या हल्ल्यात 7 नागरिकांचा मृत्यू झाला होता.