आफ्रिकेत वर्ल्ड कप खेळण्याची रोहित, विराटची शक्यता कमीच

रोहित शर्मा व विराट कोहली या टीम इंडियाच्या आजी-माजी कर्णधारांनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत मायदेशातील क्रिकेट वर्ल्ड कप गाजविला. मात्र त्यांच्या या संस्मरणीय कामगिरीला दुर्दैवाने जगज्जेतेपदाचा टिळा लागू शकला नाही.
आता टीम इंडियाचे हे दोन स्टार खेळाडू चार वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेत होणाऱया वन डे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रोहित वयाची चाळिशी गाठून निवृत्त झालेला असू शकतो, तर विराटसुद्धा 39 वर्षांचा होईल. अतिवेगवान क्रिकेटच्या जमान्यात आगामी वर्ल्ड कपमध्ये फिट विराटचे खेळणेही अवघड आहे.
36 वर्षीय रोहित शर्मा आणि 35 वर्षीय विराट कोहली यांना यंदा टीम इंडियाला जगज्जेतेपदाचा करंडक जिंकून देण्याची नामी संधी होती, मात्र फायनलमध्ये या दोघांना इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही अन् ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे जगज्जेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळविले. आगामी वर्ल्ड कप 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये होणार आहे. तोपर्यंत चाळिशी गाठलेला रोहित आणि चाळिशीच्या उंबरठय़ावर असलेला विराट हे दोघे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले असतील.
180 पैकी 5 खेळाडू 38 वर्षांपर्यंत खेळले
21 व्या शतकातील हिंदुस्थानचा सर्वात वयस्कर खेळाडू सचिन तेंडुलकर होता. त्याने 40 वर्षे 204 दिवस वयाचा असताना शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. याचबरोबर राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी हे दोनच हिंदुस्थानी फलंदाज वयाची 38 वर्षे ओलांडल्यानंतरही खेळतच होते. गोलंदाजांमध्ये आशीष नेहरा आणि अनिल पुंबळे यांनी वयाच्या 38 व्या वर्षी निवृत्ती घेतली. 21 व्या शतकात 180 खेळाडू हिंदुस्थानसाठी क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट खेळले, मात्र यातील केवळ 5 खेळाडू 38 वर्षांपेक्षा जास्त वयापर्यंत क्रिकेट खेळू शकले. यामध्ये नेहरा वगळता उर्वरित 4 खेळाडूंनी 400हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि फलंदाजांमध्ये तिघांनीही 500 हून अधिक सामने खेळले.
जुन्या खेळाडूंसाठी संघात टिकून राहणे कठीण
आधुनिक क्रिकेटमध्ये जुन्या आणि फॉर्म नसलेल्या खेळाडूंना संघात राहणे खूप कठीण आहे. टीम इंडियामध्ये गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली, हरभजन सिंग असे अनेक दिग्गज खेळाडू होते, पण तंदुरुस्ती आणि फॉर्ममुळे त्यांना वयाची 38 वर्षे ओलांडण्यापूर्वीच संघातून वगळण्यात आले. 37 वर्षीय शिखर धवन हे याचे ताजे उदाहरण आहे. 2013 आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच 2015 विश्वचषक स्पर्धेत तो हिंदुस्थानचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, परंतु 24 वर्षीय शुबमन गिलच्या आगमनाने त्याला सलामीचे स्थान रिकामे करावे लागले. आता तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या संघात स्थान मिळवू शकणार नाही. फॉर्म कायम राहिला नाही तर रोहित आणि विराटच्या बाबतीतही असंच काही घडू शकतं.