कडधान्य घेऊन येणारा ट्रक 30 फूट खोल नदीत कोसळला:गंभीर अपघातात एक ठार दोन जखमी, चुलबंद नदी पुलावर घडली घटना

कडधान्य घेऊन लाखांदूरकडे येत असलेला ट्रॅक्टर चुलबंद नदी पुलावर असंतुलित होऊन चक्क तीस फूट खोल नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी भंडारा जिल्ह्यात घडली. अण्णा रामचंद्र पारधी (वय 50) वर्ष असे मृतकाचे नाव असून राधेश्याम मधुकर ढोरे (वय 23) व राष्ट्रपाल सावजी ठाकरे (वय 50) हे गंभीर जखमी असून तिघेही सावरगाव येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, तिघेही सावरगाववरून ट्रॅक्टरमध्ये कडधान्य घेऊन लाखांदूर येथे येण्यासाठी निघाले असता लाखांदूर येथील चुलबंद नदीच्या पुलावर येताच मागाहून भरधाव वेगाने टिपर आल्याने ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. यातच ट्रॅक्टरच्या दोन्ही मोठ्या चाकांना काचबिल लावले असल्याने टिप्पर सोबत धडक तर होणार नाही या भीतीने ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर बाजूला घेण्याचा प्रयत्नात असतानाच भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर ट्राॅलीसह पुलाचे तीन लोखंडी कठडे तोडून तीस फूट खोल चुलबंद नदीत कोसळले.
घटनास्थळाकडे धाव घेतली
यात ट्रॅक्टरचालक राष्ट्रपाल सावजी ठाकरे व राधेश्याम ढोरे हे गंभीररित्या जखमी झाले तर अण्णा पारधी याच्या मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनास्थळावरून अपघातग्रस्ताचे अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर गाव असल्याने अपघाताची माहिती मिळताच असंख्य नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात माहिती देऊन पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली यात तिघांनाही तत्काळ लाखांदूरमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
चुलबंद पुलाच्या दुरुस्तीचे काम
मात्र यात उपचारादरम्यान अण्णा रामचंद्र पारधी यांच्या मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी सांगितले तर अन्य दोन जण गंभीरित्या जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या चुलबंद पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बांबूचा संपूर्ण जुगाड बांधलेला असताना जूगाड तोडून ट्रॅक्टर खाली कोसळल्याने ट्रॅक्टर चकनाचूर झाला आहे. लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.