जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य

“मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं आणि तो आवाज जरांगे पाटील यांनी उठवला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो. आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून नाही पण आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे,” अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केली. मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने ‘न भूतो न भविष्यती’ असं कार्य आरंभलं आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी ही भेट घेतली आहे. माझ्यात आणि जरांगे पाटील यांच्यात काही चर्चा झाली नाही. कारण मी काही अभ्यासक नाही. मी फक्त इथे आलो, त्यांना भेटलो आणि चहापाणी घेतलं, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “प्रत्येकाने रस्त्यावर उतरून ओरडलं पाहिजे, असं नसतं. पण त्या मोर्चाला पाठिंबा असणं महत्त्वाचं असतं. सत्याच्या बाजूने लोक नेहमीच उभे राहतात. राज्यभरात 54 लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे सध्या सर्वांचीच परीक्षा सुरू आहे. जरांगे पाटील या परीक्षेत उत्तम आहेत. त्यामुळे राजकारण्यांचीही परीक्षा सुरू आहे. मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुण यांचा विचार केलाच पाहिजे.”
20 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक हे मुंबईच्या दिशेने येणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलक अंतरवाली सराटीहून सहा दिवस पायी प्रवास करत मुंबईत येणार आहेत. मुंबईत आल्यानंतर मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करतील.