भाजप 3 प्रकारे राज्यातील सरकार पाडते – अरविंद केजरीवाल

भाजपप्रणीत केंद्रातील सरकार राज्यातील सरकार पैशांच्या जोरावर तसेच तपास यंत्रणांद्वारे आणि विशेषाधिकाराद्वारे अध्यादेश काढून राज्यातील सरकार पाडते. त्यांच्यावर बंधने आणत असून कामही करू देत नाही असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. यासह दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगबाबत केंद्र सरकारने अध्यादेश आणला आहे. त्याला विरोध करावा असे आवाहनही त्यांनी राष्ट्रवादी का्ॅंग्रेससह भाजप विरोधी पक्षांना केले आहे.
दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगबाबत केंद्र सरकारने अध्यादेश आणला आहे. त्याविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्याचसाठी केजरीवाल यांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतली, तर आज शरद पवारांना पाठिशी उभे राहण्यासाठी साकडे घातले. यावेळी त्यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही आहेत.
केजरीवाल यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. उभय नेत्यांत झालेल्या बैठकीनंतर वाय. बी. चव्हाण सभागृहात संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
आमच्यावर अन्याय
अरविंद केजरीवाल म्हणाले, आमचे सर्व सहकारी शरद पवार व त्यांच्या नेत्यांनी भेटण्यासाठी आलो आहोत. २०१५ मध्ये आमचे सरकार बनले होते. केंद्र सरकारने दिल्ली सरकारची अधिकाऱ्यांवरील कंट्रोल करण्याचे सर्व शक्ती हिसकावली. त्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. आमच्यावर अन्याय झाला होता.
भाजपच्या विधेयकाला विरोध करा
अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजपच्या त्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो तेथे आमच्या बाजूने निर्णय लागला. आठ वर्षांत आम्ही ही लढाई जिंकली. पण आठ दिवसांत केंद्र सरकारने विशेषाधिकाराद्वारे अध्यादेश काढून पुन्हा हा विषय संसदेत नेला आहे. त्यामुळे आमचा अधिकार पुन्हा गमावला गेला. ते आता या मुद्द्याबाबत विधेयक सादर करणार आहेत. ते जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक ठेवतील तेव्हा ते परित होऊ नये त्याला विरोध व्हावा ही आमची मागणी आहे. हाच विषय घेऊन आम्ही आमच्या सहकारी विरोधकांना भेटत आहोत.
भाजप 3 प्रकारे सरकार पाडते
अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजप पैशांच्या जोरावर सरकार पाडून स्वतःचे सरकार स्थापन करते. तसेच इडीसारख्या तपाससंस्थांचा लोकप्रतिनिधींच्या मागे लावून सरकार पाडते, त्याशिवाय अध्यादेश काढून सरकारला तोडण्याचे प्रकार करीत आहेत राज्य सरकारला काम करू दिले जात नाही. हे विषय गंभीर आहे.
ही लढाई सेमीफायनलची
अरविंद केजरीवाल म्हणाले, आम्ही देशप्रेमींना देशातील राज्य सरकारांना आवाहन करतो की, अशी कृत्य करणाऱ्या भाजपविरोधात एकत्र यावे. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे आम्हाला सहकार्य लाभेल त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनाही हा संदेश द्यावा. भाजपच्या या विधेयकाला जर आपण पराभूत करू शकलो तर हे लोकसभा निवडणुकीचे सेमीफायनल आपण जिंकलो असे समजता येईल.