‘मन की बात’वर जेवढे प्रेम, तेवढे संविधानावर नाही – संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमावर जेवढे प्रेम आहे, तेवढे देशाच्या संविधानावर नाही. अन्यथा देशातील स्थिती वेगळी असती, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
लोकशाही धोक्यात
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत होत आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी ही सभा आहे. नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’वर जेवढे प्रेम केले तेवढे प्रेम देशावर, संविधानावर केले असते तर देशातील लोकशाही धोक्यात आली नसती.
टाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम
संजय राऊत म्हणाले, मोदींनी ‘मन की बात’ नव्हे तर आता ‘जन की बात’ ऐकावी. ‘जन की बात’ मोदींच्या ‘मन की बात’पेक्षा वेगळी आहे. मोदींनी केवळ आपले ऐकवण्याऐवजी लोकांचे काय म्हणणे आहे ते आता ऐकले पाहीजे. दरम्यान, काल भाजपने देशभरात सेलिब्रिटींना सोबत घेऊन ‘मन की बात’ सामूहिकपणे ऐकण्याचे कार्यक्रम आयोजित केले होते. कोरोनाच्या काळात जशा थाळ्या वाजवल्या तसा कालचा इव्हेंट हा टाळ्या वाजवण्याचा होता.
पुलवामा घटनेची चौकशी करावी
संजय राऊत म्हणाले, देशाला ‘मन की बात’ची काहीही गरज नाही. केवळ भाजपला राजकीय फायद्यासाठी त्याचा उपयोग होतो. जम्मू-काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्याची चौकशी होण्याची खरे तर गरज आहे.
पुढील मुख्यमंत्री मविआचा होईल
दरम्यान, राज्यात पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी असे वक्तव्य करावी लागतात. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून सध्या मविआच्या घटकपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. पुढे संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी मुख्यमंत्री महाविकास आघाडीचेच होते ना. येणाऱ्या काळातही मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल, ऐवढेच मी सांगू शकतो.