मराठा आरक्षण : मनोज जरांगे मुंबईच्या मुंबईच्या वेशीवर, सरकारच्या हालचाली वाढल्या

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (20 जानेवारी) सकाळी मुंबईकडे कूच केली होती. आता मनोज जरांगे पाटील त्यांच्या समर्थकांसह मुंबईच्या वेशीवर दाखल झाले आहेत.
मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आता सरकार कडून प्रयत्न सुरु झाले आहेत.
जरांगेंच्या भेटीसाठी पुन्हा एकदा मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधूकर अर्दड दाखल झाले आहेत.
दरम्यान पुण्यातून लोणावळ्याकडे जाताना जरांगेंच्या मोर्चाला ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळाला. सकाळी साडेनऊ वाजता खराडी मधून मोर्चाला सुरुवात झाली.
त्यानंतर दिवसभर म्हणजे जवळपास 10 तास हा मोर्चा नगर रोड परिसरातच होता. ठिकठिकाणी होणाऱ्या स्वागत आणि गर्दीमुळे जरांगेंना पुढे सरकणे अवघड जात होते.
रात्री साधारण आठच्या सुमारास पुणे शहरातून मोर्चा पिंपरी चिंचवडकडे गेला. तर मध्यरात्री उशिरा लोणावळ्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. उशीर झाला तरी लोक जरांगेंच्या स्वागतासाठी हजर होते. पहाटे साधारण 5 च्या सुमारास जरांगे लोणावळ्यातील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले.
मनोज जरांगेंना उच्च न्यायालयाची नोटीस
दुपारच्या सुमारास गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी भुमिका मांडताना सदावर्तेंनी जरांगे दाखल होत आहेत तिथे गर्दीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आणि शाळांनाही सुट्टी द्यावी लागत आहे.
हा मोर्चा मुंबईत दाखल झाल्यास लोकांना अडचण होईल असं म्हणत सदावर्तेंनी मोर्चाला मुंबईत यायला परवानगी नाकारण्याची मागणी केली.
तर यावेळी भूमिका मांडताना महाधिवक्त्यांनी आपल्याकडे परवानगीचा कोणताही अर्ज आला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना जरांगेना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना जरांगे म्हणाले ” नोटीस बजावली म्हणून काय झालं. न्यायमंदिर आमच्याशी पण न्याय करणार. काय न्याय दिला हे आम्हांला बघावं लागेल. आम्ही न्यायालयाकडे गेलो तर आम्हांला पण न्याय देतील. कोणी काय म्हणल्याने चालत नसतं.
तर सदावर्ते यांच्या याचिकेविषयी विचारल्यावर जरागेंनी त्यांना काय करायचं ते करू द्या. आम्हांला त्यांच्याबद्दल (सदावर्ते) विचारू पण नका. आमच्या मुंबईतल्या लोकांनी अर्ज केलेला आहे. आम्ही आमच्या गावाकडून एसपींना पण कळवलं आहे.