महाराष्ट्रात आरपार दणका…

महाराष्ट्रात महायुती 45 जागा जिंकणारच अशी घोषणा केली गेली होती. ही घोषणा देशात आप की बार भाजप 400 पार याला पूरक अशीच होती. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी निश्चितच राज्यात आणि देशभर भाजपला पूरक असं वातावरण आहे असे चित्र सर्वांसमोर येत होतं. पण हे चित्र एकतर्फी होतं का? वादळापूर्वीची ही शांतता आहे का?
याचं अध्ययन करण्याची गरज कोणालाच वाटली नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडून भारतीय जनता पार्टीने सत्ता मिळवली. या सार्याच श्रेय अमित शहा यांच्या नेतृत्वात कार्यरत असणार्या देवेंद्र फडणवीस यांना मिळालं. किंगमेकर, चाणक्य वगैरे उपाध्या त्यावेळी प्रसार माध्यमांनी, पक्षाच्या अनेक स्थानिक नेतेमंडळींनी फडणवीस यांना दिल्या. फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा काही प्लॅन तयार केला होता. अनेक खाजगी एजन्सी नेमल्या होत्या. त्या अगदी गाव पातळीपर्यंत प्रत्येक मतदार संघामध्ये जाऊन माहिती घेऊन त्याचे फीडिंग करत होत्या. त्या आधारावर कोणाला किती जागा द्यायच्या. स्वतः किती लढवायच्या. तिथे कोणते उमेदवार असावेत या सार्याचे निर्णय फक्त आणि फक्त फडणवीसच घेत होते. याचमुळे आता झालेल्या पराभवानंतर फडणवीस यांच्यावर जर टीकेची झोड उठत असेल, पक्षांतर्गतही धुसफूस पुढे येत असेल तर त्याला सामोर जाण्याचं धैर्य, धारिष्ट त्यांनी दाखवलंच पाहिजे. मोठ्या मनानं त्यांनी राजिनामाची तयारी दाखवली आहे पण ते राजकीय नाटक नको तर कृती मध्ये ते दिसायला हवं. ज्यावेळी चांगलं काम झालं तर कौतुक झालं. पाठ थोपटून घेताना आनंद वाटला. त्याच प्रकारात जर पराभव आपल्यामुळे झाला आहे तर येणार्या टिकेला सामोरे जाण्याचे धैर्यही दाखवावंच लागतं. महाराष्ट्रामध्ये शिवसेना सारखा कडवा हिंदुत्ववादी पक्ष, 25 वर्षाचा मित्र सत्तेच्या हव्यासापोटी शहा-फडणवीस यांनी फोडला. याचं पातक त्यांना लागलं आहे का? मुंबई महानगरपालिकेची सत्ता आपल्याकडे असावी या आणि याच केवळ हेतून आजवर भारतीय जनता पार्टीने नेहमीच अगदी युती पक्की असतानाही शिवसेनेला त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही. ती मुंबई महापालिका आता मिळेल की नाही कोणास ठाऊक? पण हातातील, राज्यातील सत्ता तरी टिकते की नाही याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. उद्धव ठाकरेंवर होणारी एकतर्फी टीकाटिप्पणी. त्यांच्या समर्थकांवर पडणार्या धाडी, त्यांची सत्ता घालवणं असं झालं. शरद पवारांच्या पक्षावर प्रचंड टीका करणे आणि प्रसंगी त्यांच्याच काही चेल्यांशी हात मिळवणी करणे हे कसलं राजकारण? हे लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. सत्तेसाठी वाटेल तसे प्रयोग महाराष्ट्रात भाजपाकडून होवू लागले हे लोकांना आवडलेलं नाही. अजूनही फडणवीस आणि त्यांच्या मागेपुढे करणार्यांना ते समजलं की नाही कोणास ठाऊक? ज्या अजित पवारांवर सिंचन घोटाळ्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आदल्या दिवशी पंतप्रधान संसदेत करतात. त्याच अजित पवारांना चार दिवसात आपल्या पक्षात घेऊन मंत्रिपद दिलं जातं. त्यांच्या चौकशा थांबतात. हे कसलं स्वार्थाचे राजकारण. अजित पवार गट,अशोक चव्हाण गट यांना पक्षात घेण्याचा हेतू काय? याविषयी लोकांना शंका येऊ लागली. तिथेच भाजपा विरोधात जनमत जाऊ लागलं. पण याचा कोणाला खेद ना खंत अशी स्थिती होती. स्थानिकांना न जुमानता आपल्याला वाटेल तोच उमेदवार लादायचा, याचा फटकाही भाजपला बसला आहे. ठाकरे, शरद पवार राजकारणातून बाहेर पडतील अशा बातम्या पसरवणार्यांना अंजन घालणारा असाच हा निवडणूक निकाल आहे. काँग्रेसमुक्त देश होऊ शकत नाही. शिवसेना वगळून मुंबई महानगरपालिका राहू शकत नाही. महाराष्ट्रात शरद पवारांच्या शिवाय स्थानिक कोणत्याही सत्ता टिकू शकत नाही. असं आजवर महाराष्ट्रानं अनुभवलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसमुक्त झाला नाही उलट सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे महाआघाडी महायुतीपेक्षा मोठी होऊन बसली आहे. हे अपयश कोणाचं हे फडणवीसांनीच सांगाव.
अविनाश सी.कुलकर्णी