वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे माढा तालुक्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मिळणे बाबत प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने माढा तहसील ला निवेदन …

माढा तालुक्यात काल प्रचंड स्वरूपात वारे आणि वादळ निर्माण झाले होते. सदरच्या वादळामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते. या वाऱ्याचा वेग इतका होता की वीट बांधकाम असलेल्या घरावरील ही पत्रे उडून गेल्याचे दिसून येत आहे.
लोकांच्या वस्त्या, पत्रा शेड , जनावरांचा महत्त्वाचा चारा असलेल्या कडब्याच्या गंजी ही वादळात उडून गेल्या आहेत. अक्षरशः शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकंदर दुष्काळाच्या परिस्थितीमुळे केळी, पेरू, आंबा या फळबागा आणि भाजीपाला शेतकऱ्यांनी कसा बसा सांभाळला होत्या. त्याही उद्ध्वस्त झालेल्या दिसून येत आहेत. त्यांचेही प्रचंड नुकसान झालेले आहे. मोठ मोठी फळं झाडे आणि इतरही झाडे उन्मळून पडली आहेत. सामान्य शेतकऱ्यांचा प्रपंच उघड्यावर आला आहे. त्यामुळे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रहार शेतकरी संघटनेने केली आहे. त्या प्रसंगी नायब तहसीलदार विजय लोकरे साहेब यांना प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आले आहे. त्याप्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे, तालुका संपर्क प्रमुख राजाभाऊ शिंदे, तालुका सचिव यशवंत चव्हाण, तालुका संघटक मालोजी चव्हाण, युवा नेते सिराज शेख , सत्यवान लटके, कुमार चव्हाण, निलेश पाटील उपस्थित होते.