शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही – बच्चू कडू…

अमरावती : जात, धर्म, राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेऊन शेतकरी म्हणून एक झाले पाहिजे तरच या राज्यातला बळीराजा जिवंत राहील असे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह अन्य १७ मागण्यासाठी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे. सध्या कडू यांची प्रकृतीत बिघाड झाला असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही असा पवित्रा कडू यांनी घेतला आहे.
सलग चार दिवस झाले तरी सरकारकडून कर्जमाफीसह अन्य मागण्या मान्य न झाल्याने राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. टॉवर वर चढून शोले आंदोलन, आमचे कपडे घ्या पण कर्जमाफी द्या आंदोलन, चूल बंद आंदोलन केले जात आहे.
सध्या राज्यभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी उपोषणस्थळ मोझरी येथे भेट देत कडू यांना आपला पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांनीही फोन करून आपले समर्थन दिले आहे. तसेच आमदार रोहित पवार, संभाजीराजे छत्रपती, रविकांत तुपकर, निकेश लंके, राजू शेट्टी आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजाचे नेट्व मनोज जरंगे पाटील, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, पॅंथर सेनेचे दीपक केदार, भोई समाज यांनी पाठिंबा दिला आहे.