‘शेवटचे दोन दिवस नाही तर आम्ही तो कागद जाहीर करू’, जरांगेंचा सरकारला इशारा

जालना, 15 डिसेंबर, सिद्धार्थ गोदाम : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे. ही डेडलाईन पूर्ण होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. 17 तारखेला महाराष्ट्रातील मराठा समाजाची बैठक बोलावल्याचं या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
17 तारखेला महाराष्ट्रातील समाजाची बैठक बोलावली आहे, राज्यातील सर्व मराठा सेवक, आयोजक, उपोषणकर्ते, वकील डॉक्टर, व्यावसायिक, अभ्यासकांनी या बैठकीला यावं. अंतरवाली सराटीमध्ये जीथे सभा झाली होती, त्याच ठिकाणी ही बैठक होणार आहे. प्रत्यक्ष समाजाच्या हिताचा विषय असल्यानं सर्वांनी उपस्थित राहावं, आमंत्रण सगळ्या समाजाला आहे, आमंत्रणाची वाट पाहात बसू नये, सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेदरम्यान ही बैठक होईल. असं आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाची दिशा भूल होते की काय अशी परिस्थिती आहे. म्हणून तुम्ही 17 तारखेच्या आत तुमची भूमीका आम्हाला कळवा. 17 तारखेला आमची भूमिका ठरली तर आम्ही ऐकणार नाही. बच्चू भाऊ यांच्याकडे लिहिलेला कागद आहे, सरकारने भूमिका स्पष्ट करावी नाही तर तो कागद आणि व्हिडीओ आम्ही जाहीर करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.