❓❓❓कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास ‘सातवे आस्मान’पे, भाजप मात्र संभ्रमात

मुंबईतील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले असून महायुतीला सहाही जागा कशा जिंकता येतील, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत, तर भाजपने कामगार मैदानात मेळावा घेत रणशिंग फुंकले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मात्र मविआचे सहाही उमेदवार मराठी असल्याचे सांगत महायुतीचे उमेदवार कलंकित असल्याने फायदा आमचाच असल्याचा दावा केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांचे पती यशवंत यांच्यावर आरोप केले होते. आता या कलंकित उमेदवारांचा प्रचार कसा करणार, असा प्रश्न करीत निवडणूक आम्हाला सोपी झाली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे निवडणूक प्रमुख अनिल परब यांनी आज शिंदे गटाने दाखल केलेल्या उमेदवारांवरील आरोपांचा पाढाच वाचला.
मराठी विरुद्ध अमराठी अशा लढ्यात आता स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आणि कलंकित ईडी आरोपग्रस्त असा संघर्ष प्रचारात सुरू होण्याची लक्षणे आहेत.
तसेच वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे दलित मुस्लिम मतदार आमच्या पाठीशी आहेत असा दावा केला. अरविंद सावंत, अनिल देसाई यांच्यासारखे शिवसेनेचे शिलेदार उमेदवार असल्याचे नमूद केले आहे.
भाजप कार्यकर्ते संभ्रमात
वायकर यांच्या प्रचाराला भाजप कार्यकर्ते जाणार काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. मात्र, वायकर यांनी मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवला आहे.
त्यांनी जोगेश्वरी परिसराचा केलेला विकास लक्षात घेता वायकर हे विकासपुरुष असल्याचेही काही कार्यकर्ते मान्य करतात. पण महायुतीत एकवाक्यता हा प्रश्न असतानाच मराठी उमेदवार देणारी मविआ आघाडी जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता.