सोलापूरातील 5 जण स्थानबद्ध तर 14 जण तडीपार
पोलिस उपायुक्त विजय कबाडेंचा गुन्हेगारांना झटका

सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, शांततेत व निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात, यासाठी शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यावर जोर दिला आहे. जानेवारीपासून मार्च अखेर या तीन महिन्यांच्या कालावधीत १४ जणांना पोलिसांनी तडीपार केले आहे तर पाचजणांवर एमपीडीए अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई सोलापूरचे डॅशिंग पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी केलेली आहे. संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये पोलिसाप्रती आता मात्र भीती निर्माण होऊ लागलेली आहे.
सोलापूरची लोकसभा निवडणूक सात मे रोजी होणार आहे. यासाठी बहुतांश पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत तर काही पक्षांचे उमेदवार अद्याप ठरले नाहीत. १२ एप्रिलपासून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात होईल.
लोकसभा निवडणूक निर्भय वातावरणात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना सुरुवातीपासूनच कष्ट घ्यावे लागतात. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर त्यांच्या गुन्ह्यांच्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे प्रस्ताव निवडणुकीपूर्वीपासूनच सुरू करण्यात आले आहेत. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत अशांना स्थानबद्ध, वेगवेगळ्या जिल्ह्यातून तडीपार केले जाते. दोनपेक्षा अधिक
गुन्हे असणाऱ्यांवरही वेगवेगळ्या कारवाया
पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखा व विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. त्यानुसार विविध कारवाया पोलिसांकडून करण्यात येत आहेत.
यावर्षीच्या जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत अनेक गुन्हे दाखल असलेल्या पाचजणांना एमपीडीए अंतर्गत पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. याचप्रमाणे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांचे प्रस्ताव त्या त्या पोलीस ठाण्याच्या
पोलीस निरीक्षकांमार्फत पोलीस उपायुक्त कबाडे यांच्याकडे पाठविण्यात आले असून तीन महिन्यांत तब्बल १४ जणांना सोलापूर शहर, जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. त्या गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना ठरावीक शहरात सोडण्यात आले आहे.
येत्या काही दिवसात आणखी अनेक गुन्हेगार पोलिसांच्या लिस्टवर असून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे कारवाया करण्यात येणार आहेत.
पोलिसांच्या गुन्हेगारांवरील या कारवायांमुळे निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.



