उन्हाचा वाढता पारा विद्यार्थ्यांसाठी धोकादायक, आजच शाळांना सुट्ट्या जाहीर करा -दीपक केसरकर

राज्यात दिंवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षण आणि क्रिडा विभागाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आजपासून (दि.21) राज्यातील शाळांना सुट्टया देण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत.
गुरुवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मे महिन्याच्या सुट्टीच्या अनुषंगाने महत्त्वाचे वक्तव्य करत विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या असतील, आजच शाळांना सुट्ट्या जाहीर करा असे वक्तव्य केले होते. त्यानंतर लगेचच या निर्णयाची अंमलबजावणी करत परिपत्रक काढण्यात आले.
उष्णतेची लाट धोकादायक
एकीकडे पावसाने कहर केला असतानाच दुसरीकडे राज्यात उष्णतेची लाट आहे. बहुतांश शहरात चाळीच्या आसपास आणि चाळीशी पार तापमान गेले आहे. त्यामुळे ही स्थिती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकते अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच शिक्षण मंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते.
राज्यातून अवकाळीचा प्रभाव कमी होत असतानाच एप्रिल महिन्याच्या अखेरपासून उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. अशा परिस्थितीत यंदा शाळांना मे महिन्याची सुट्टी एप्रिलपासून देण्यात येत असल्याचे केसरकर म्हणाले.
जास्तीची सुट्टी मिळणार
मंत्री दीपक केसरकर यांनी उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यास देऊ नये, या म्हणण्यावर जोर देत राज्यातील शाळा 13 ऐवजी 15 जून रोजी सुरु होणार असल्याचे सांगितले. सोबतच विदर्भात मात्र शाळा 30 जूनला सुरु होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शालेय शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आणि दिलेल्या निर्देशांमुळे यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना जास्तीची सुट्टी मिळणार हे निश्चित झाले आहे.