स्त्रियांच्या प्रगतीनेच देशाची प्रगती होत असते – भालशंकर

आजची स्त्री ही अबला नसून सशक्त आहे. ती कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. स्त्रीने आपले कर्तुत्व सिद्ध करून दाखवले आहे. स्त्रियांच्या प्रगतीवरूनच देशाची प्रगती समजत असते असे विचार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी मांडले. ते सदसंकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालय सोलापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान मातांचा आणि शीलवंत, ज्ञानवंत, गुणवंत, धाडसी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी बौद्ध महासभेच्या राज्य उपाध्यक्ष धम्मरक्षिता कांबळे, डॉ. अहिल्यादेवी गायकवाड सत्यवान पाचकुडवे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना भालशंकर म्हणाले की, आजच्या स्त्रीने न घाबरता संकटांना सामोरे गेले पाहिजे. समाजातील वाईट चालीरीती, रूढी, परंपरा, प्रथा यांना लाथाडले पाहिजे. यावेळी धम्मरक्षिता कांबळे, डॉ. अहिल्यादेवी गायकवाड यांनी आपले मनोगते व्यक्त केले. यावेळी पार्वती माने, श्रीदेवी बगले, विद्या स्वामी, सुजाता कोणदे, सविता गायकवाड, मुमताज पटेल, राजश्री गायकवाड, परविन मुजावर, सुमन शिंदे, महिबूबी मकानदार, करिष्मा पठाण, इंदुमती हिरेमठ, भाग्यश्री अलकुंठे, कोमल बाळशंकर, राजलक्ष्मी इरवाडकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. प्रास्ताविक रामचंद्र व्हनकडे यांनी केले तर दिनेश भालशंकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.