
औरंगाबाद (प्रतिनिधि):- औरंगाबाद खाजगी शाळांमधील शिक्षकांना प्रचारास मज्जाव नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद खंडपीठात केले. यावरुन न्या. प्रसन्न बी. वैराळे आणि न्या. अविनाश जी. घारोटे यांनी याचिका निकाली काढली. प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यास मज्जाव करणाऱ्या खासगी शाळेच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने वरीलप्रमाणे स्पष्टीकरण केले होते.
बीड येथील शिवाजी विद्यालयातील शिक्षक शंकर “तात्याबा सांगळे आणि संतोष बापूसाहेब मस्के यांनी अॅड. गिरीश के. थिगळे (नाईक) यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार ३१ मार्च २०१९ रोजी रविवारी सुटीच्या दिवशी दोन्ही याचिकाकर्ते अनुक्रमे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने रॅलीमध्ये सहभागी झाले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार हिरावून घेणारा संस्था चालकांचा आदेश रद्द करावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणावरून खंडपीठाने याचिका निकाली काढली.



