वैनगंगा नदीच्या पात्रात चक्क मृतदेह पुरण्यात आलेत !

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीच्या पात्रात चक्क मृतदेह पुरण्यात आलेत. सावली, गडचिरोली तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता उन्हाळ्यात नदीचे पाणी आटल्याने सांगाडे उघडे पडलेत. या ठिकाणाहून अनेक गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिक चिंतेत पडलेत.
नदीपात्रातल्या मृतदेहामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. या प्रकारावर प्रशासन काय कारवाई करते पाहावे लागेल.
योजनांना पाणीपुरवठा
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून वैनगंगा नदी जाते. नदीच्या पूर्वेला गडचिरोली तालुका, तर पश्चिमेला चंद्रपूरमधल्या सावली तालुक्याचा विस्तार झाला आहे. सावलीतल्या नदीपात्राचे उन्हाळ्यात पाणी कमी होते. मात्र, ते आटत नाही. येथून अनेक गावांना, विविध पाणीपुरवठा योजनांना पाण्याचा पुरवठा होतो.
जागा ठरवून दिली
वैनगंगेच्या पात्रावर मृतदेहाच्या दफनासाठी जागा ठरवून देण्यात आली आहे. मात्र, अनेक गडचिरोली तालुक्यातल्या अनेक गावातले नागरिक मृतदेह आरक्षित जागेत दफन करत नाहीत. तर त्यांना नदी पात्रातल्या वाळूत खड्डे करून पुरतात. आता या भागातल्या नदी पात्राचे पाणी आटले आहे. त्यामुळे हे सांगाडे उघडे पडलेत. हे भयाण दृश्य काळीज पिळवटून टाकते.
पाणी झाले दूषित
दुसरीकडे सावली तालुक्यातल्या नदी पात्रातले पाणी प्रवाहित आहे. त्यामुळे या मृतदेहाची राख, सांगाडे या पाण्यातून वाहत जाण्याची भीती आहे. तसेच या सांगाड्यामुळे नदी पात्रातले शिल्लक पाणी दूषित झाले आहे. हे पाणी दूरपर्यंत जाते. अनेक योजनांना पुरवठा होतो. यातून एखादी रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणी प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.