‘बीआरएस’चे शेतकरी प्रेम ढोंगी, सोलापुरात पाय ठेवू देणार नाही……

‘अबकी बार किसान सरकार’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्रात आलेल्या भारत राष्ट्र समिती या पक्षाचे शेतकरी प्रेम ढोंगी असल्याचे बोरामणी विमानतळ विकास व सिद्धेश्वर कारखाना बचाव समितीने म्हटले आहे.
चिमणीमुळे सोलापूरचा विकास खुंटला अशी टीका पक्षाचे महाराष्ट्र समन्वयक बी. जे. देशमुख यांनी केली होती. त्याला समितीने उत्तर देताना म्हटले, की सिद्धेश्वर कारखाना दरवर्षी सभासदांना ५०० कोटींहून अधिक रक्कम देत असतो. त्याने ५ तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या घरांत पैसा गेला. समृद्धी आली. ५० वर्षांपासून हे अविरत सुरू आहे. यालाच तर विकास म्हणतात. कारखान्यावर १५ हजार लोकांची उपजीविका चालते. ही वस्तुस्थिती असताना कारखाना उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांना खासगी कारखान्यांच्या दावणीला बांधण्याची केसीआर यांची योजना आहे काय? असा प्रश्न बचाव समितीचे सदस्य दत्ता थोरे, अॅड. रा. गो. म्हेत्रस, राजू चव्हाण, अमोल हिप्परगी यांनी विचारला आहे.
…तर कर्नाटकी हिसकाच
लिंगायत समाजातील नेत्यांना कायम दुय्यम स्थान देऊन त्यांना डावलल्याचा परिणाम कर्नाटकच्या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. नेत्यांनी त्यापासून धडा घ्यावा. कोणत्याही राजकीय पक्षाने कारखान्याच्या मुळावर उठण्याचा प्रयत्न केला तर आगामी निवडणुकांमध्ये झटका बसल्याशिवाय राहणार नाही. सोलापूर जिल्हा हा लिंगायत समाजाचा बालेकिल्ला आहे, असे कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, संचालक शिवानंद पाटील, शिवशंकर बिराजदार, महादेव धुम्मा, राजशेखर पाटील, अशोक पाटील यांनी म्हटले आहे.
वाकड्या नजरेने पाहाल तर
सिद्धेश्वर कारखान्याच्या मुळावर उठण्याचा प्रयत्न बीआरएसच्या बाहेरील नेत्यांनी करू नये. कारखान्याचे मालक असलेल्या ३० हजार शेतकरी सभासद आणि १५ हजार कामगारांच्या रोजी-रोटीवर कुणी वाकड्या नजरेने पाहू नये. बाहेरून येऊन सोलापूरचे वातावरण बिघडवू पाहणाऱ्यांना सोलापुरात पायही ठेवू देणार नाही.- अशोक बिराजदार, अध्यक्ष, कारखाना कर्मचारी युनियन