आषाढी वारीसाठी मोठा निर्णय; 10 जुलैपासून पंढरपुरात VIP दर्शन बंद, मंदिर परिसर नो व्हेईकल झोन

आषाढी शुद्ध एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी, भाविक येतात. त्यांना मागील वर्षी प्रमाणे यावर्षीच्या आषाढी वारीतही दर्शन कमी वेळेत व सुलभपणे व्हावे यासाठी 10 जुलै 2026 पासून व्हीआयपी दर्शन बंद तसेच मंदिर परिसरात नो वेहिकल झोन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
आषाढी वारी 2026 अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली केबीपी कॉलेजच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आले होती, त्या प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, राष्ट्रीय महामार्ग चे प्रकल्प संचालक अभिजीत औटी, पोलिस उप विभागीय अधिकारी प्रशांत डगळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सह आयुक्त नगरपालिका आशिष लोकरे, अन्य धान्य पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, वीज वितरण चे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्या सह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, मागील वर्षी व्हीआयपी दर्शन बंद केल्याने वारकरी भाविक यांचा श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा वेळ किमान पाच ते सहा तास कमी झाला. तसेच मंदिर परिसरात नो व्हेकल झोन लागू केल्याने भाविकांना मंदिराला प्रदक्षिणा घालणं तसेच दर्शन घेऊन बाहेर पडणे सुलभ झाले होते. तसेच पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले होते. त्यामुळे यावर्षीही 10 जुलैपासून प्रशासनाने या दोन्ही बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रशासनाने यावर्षीच्या वारीतही स्वच्छतेला सर्वोत्तम प्राधान्य द्यावे. नागरी भागात नगरपरिषद तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने वारीच्या अगोदर आठ दिवसापासून स्वच्छता मोहीम सुरू ठेवावी. पंढरपूर शहर, वाखरी पालखी तळ, 65 एकर आणि वाळवंट या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालये तसेच तात्पुरत्या शौचालयाची स्वच्छता व्यवस्थित करावी. महिला स्नानगृहे, हिरकणी कक्ष निर्माण करून त्यात आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच पंढरपूर शहर तसेच उपरोक्त सर्व ठिकाणी कोठेही कचरा पडणार नाही यासाठी पुरेसे साफसफाईचे कर्मचारी नियुक्त करावेत. शौचालयाच्या ठिकाणी चिखल होणार नाही या दृष्टीने मुरमीकरण, काँक्रिटीकरण करून घ्यावे. पाणी, वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरपरिषद पंढरपूर यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून शहरातील सर्व रस्त्यावरील खड्ड्यांचे दुरुस्ती करून घ्यावी तसेच नवीन मंजूर करण्यात आलेले रस्ते ही वेळेत पूर्ण करावेत. बांधकाम विभागाने शहरात आणखी रस्ते दुरुस्ती करण्यासाठी निधी आवश्यक असेल तर त्याबाबतची मागणी तात्काळ सादर करावी, पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पालखीच्या दोन्हीही मार्गावर प्रत्येक मुक्कामे विसावा ठिकाणी शौचालय अगोदर दोन दिवस उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषदेने सातारा व पुणे जिल्हा परिषदेची योग्य समन्वय ठेवावा यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
पालखी मार्गाच्या बाजूंना रस्त्याच्या कडेला विहिरी असतील तर संबंधित विभागांनी तात्काळ त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात किमान सात ते आठ फूट उंचीचे मजबूत बॅरिकेटिंग करून घ्यावेत. चंद्रभागा नदीपात्रातील मोठे खड्डे जेसीबीच्या साह्याने तात्काळ भरून घ्यावेत. जलसंपदा विभागाने चंद्रभागा नदीत आषाढी एकादशीच्या अगोदर पाच सहा दिवस पाणी पोहोचेल या दृष्टीने धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र बैठक घ्यावी. वारकरी, भाविकांसाठी पालखी मार्ग पंढरपूर शहर पालखी तळ या ठिकाणी दिशादर्शक चिन्ह मोठ्या अक्षरात व दिसेल अशा उंच ठिकाणी बसवावेत. आरोग्य विभागाने तिन्ही जिल्ह्यांना औषधांचा मुबलक पुरवठा करावा. पालख्या सोमवेत आरोग्य पथके ठेवावीत. वीज वितरण कंपनीने वारीसाठी पुरुष मनुष्यबळ उपलब्ध ठेवून ते 24 तास कर्तव्यावर राहतील असे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री गोरे यांनी दिल्या.
मुख्यमंत्री आरोग्य रथ (मेडिकल ऑन व्हील) तसेच मुख्यमंत्री वारकरी सेवा सुविधा केंद्रात वारकरी भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी वाखरी ते केबीपी कॉलेज पर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करावीत व स्वच्छता करून घ्यावी डिव्हायडरच्या मध्यभागी वृक्षारोपण करून घेणे लाइटिंग ची व्यवस्था करावी अशा सूचना श्री गोरे यांनी देऊन सर्व संबंधित विभागांनी मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही परस्परात योग्य समन्वय ठेवून सर्वोत्तम काम करावे, असे आवाहन केले. तसेच मागील वर्षीच्या आषाढी वारीत केलेल्या कामाबद्दल सर्व विभागांचे त्यांनी अभिनंदनही केले.
बैठकीस आमदार समाधान आवताडे ऑनलाइनद्वारे उपस्थित होते यावेळी त्यांनी आषाढी यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक एसटी बसद्वारे येतात. बसस्थानकाच्या ठिकाणची स्वच्छता राहण्यासाठी एसटी महामंडळाने ज्यादा स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. वारी कालावधीत पंढरपूर शहर व परिसरातील वेळोवेळी स्वच्छता होण्यासाठी ज्यादा स्वच्छता कर्मचारी नेमावेत. तसेच वारी कालावधीत मोबाईल नेटवर्कच्या समस्या उद्भवत असल्याने त्यावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही वारीत परस्परात समन्वय ठेवून वारी यशस्वी करू असे सांगितले. तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस विभागाच्या वतीने गर्दीवर नियंत्रण ठेवणे तसेच सुरक्षेसाठी उपाययोजना करणे याबाबत नियोजन केल्याचे सांगितले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने पालखी मार्गावर वारकऱ्यांना सुविधा उभारण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी वारीसाठी केलेल्या कामाची माहिती दिली तर मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, पुरवठा विभाग, अन्न व औषध प्रशासन, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा पत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली.



