“प्रवेशोत्सवाच्या जल्लोषात नवागतांचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत; विद्यार्थ्यांना प्रेरणेचा नवा संदेश”

अक्कलकोट रोडवरील, सद्संकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात करण्यात आले.*या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. सचिन जगताप साहेब (शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद सोलापूर) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्संकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे उपस्थित होते.तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष बोधिप्रकाश गायकवाड उपस्थित होते.
यावेळी सूरजअंबुरे , गुरु रेवे, अरविंद ताटे (माध्यमिक शिक्षण विभाग, सोलापूर), उपस्थित होते. तसेच, मुख्याध्यापक सत्यवान पाचकूडवे व मुख्याध्यापिका मंजुश्री भालशंकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. नवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
यावेळी विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नवीन पुस्तकांचे आनंदाने स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. सचिन जगताप साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा, कठोर परिश्रम करण्याचा आणि अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करत राहण्याचा संदेश दिला. डॉ. कलाम यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून शिक्षणाच्या बळावर देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत मजल मारली. त्यांचे शिस्तबद्ध जीवन, विज्ञानावरील प्रेम, देशभक्ती आणि विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा, असे त्यांनी सांगितले. “स्वप्ने ती नसतात जी झोपेत पडतात, तर स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत,” हा डॉ. कलाम यांचा संदेश विद्यार्थ्यांसमोर मांडत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत संस्कार, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी मोबाईल व इतर आकर्षणांपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, वाचनाची सवय लावावी आणि शिक्षक व पालकांचा आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, कष्ट आणि चिकाटी यांच्या बळावर जीवनात यश संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सत्यवान पाचकूडवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी दिनेश भालशंकर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली.



