गद्दारांवर थुंकणे हा तर हिंदू संस्कृतीचा भाग – संजय राऊत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे व शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत भर पत्रकार परिषदेत थुंकले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून राऊतांविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. त्याला आज संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
संताप व्यक्त करण्यासाठी अशी कृती
संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर असून त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवसैनिकांसोब त्यांनी आरती केली. येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, बेईमान लोकांवर थुंकणे हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे. संताप व्यक्त करण्यासाठी हिंदू लोक अशी कृती करतात. गद्दारांशी राग व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर तर भर कोर्टात थुंकले, अशी नोंद इतिहासात आहे. याविषयी माहिती देताना संजय राऊत म्हणाले, वीर सावकरांविषयी एका गद्दारांने इंग्रजांना माहिती दिली होती. त्यानंतर सावरकरांना कोर्टात आणले असता सावरकरांनी कोर्टात त्या गद्दाराला पाहीले. तो गद्दार दिसताच सावरकर त्याच्याकडे पाहून थुंकले.
मी सावरकरांकडून काही गोष्टी आत्मसात केल्या
संजय राऊत म्हणाले, मी कोणत्याही राजकीय नेत्यावर थुंकलेलो नाही. मी स्वांत्र्यवीर सावरकर यांचा भक्त आहे. मी गद्दारांवरच थुंकलो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करत असतो. पत्रकार परिषदेत गद्दारांचे नाव घेताच माझी जीभ चावली गेली. त्यामुळे मी खरे तर थुंकलो. मात्र, गद्दारांना वाटते मी त्यांच्यावरच थुंकलो. हे खरे आहे की महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर थुंकत आहे. त्यामुळे सतत आपल्यावर कोणी ना कोणी थुंकत आह, अशी भीती गद्दारांना वाटत आहे.
शिंदे गटाला काम ना धंदा
दरम्यान, संजय राऊतांविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा शिंदे गटाने केली आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाला सध्या काम ना धंदा. त्यांच्याकडे कार्यकर्तेही नाहीत. ते काय जोडे मारो आंदोलन करणार. त्यांनाच लोक जोडे मारताय. आम्ही फक्त निवडणुकीची वाट पाहतोय. तोपर्यंत त्यांचा जो काय टाईमपास चाललेला आहे. तो चालू द्या. शिंदे गट हा भावनाशुन्य लोकांचा गट आहे. खरेतर त्यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेशी गद्दारी केली, त्यावरून त्यांनी स्वत:लाच जोडे मारून घेतले पाहीजे. शिंदे गट हा बिनडोक आहे. आता माझ्यामुळे त्यांना किमान आंदोलनाच तरी काम मिळाले, याचा मला आनंद आहे. त्यांच्या आंदोलनाला चांगली प्रसिद्धी द्या. जेणेकरून हे गद्दार लोक आणखी लोकांसमोर जातील. त्यांची गद्दारी आणखी उघडी पडेल. निवडणुकीत तर त्यांचे पाणिपत होणारच आहे.
नाशिक लोकसभा शिवसेनाच जिंकणार
दरम्यान, जागावाटपावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असतानाच ठाकरे गटाने नाशिक लोकसभेवरही दावा केला आहे. संजय राऊत म्हणाले, नाशिकची लोकसभा शिवसेनाच जिंकू शकते. नाशिकमध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे. जागा वाटपासंदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन चर्चा करतील व तोडगा काढतील.
रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. संजय राऊत म्हमाले, या घटनेनंतर केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी खरे तर तातडीने राजीनामा द्यायला हवा. स्वत: रेल्वेमंत्री वैष्णव हेदेखील ओडिशाचेच आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा. तंत्रज्ञान एवढे प्रगत झालेले असताना रेल्वे रुळावरून घसरतेच कशी, तीन रेल्वेंच्या धडका होतातच कशा, असा सवालही संजय राऊतांनी केला.