सोलापूरातील या मिरवणुकीला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्या… पहा कोणी केली मागणी….

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीचा परवाना रात्री १२:०० वाजेपर्यंत वाढवून द्या- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीची मागणी
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने साजऱ्या होणाऱ्या ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरेला चालना मिळावी, आणि मंडळांना संपूर्ण वेळ मिळावा यासाठी, मिरवणुकीचा परवाना रात्री १२:०० वाजेपर्यंत वाढवून देण्यात यावा , अशी मागणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी मध्यवर्ती समितीचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे , माजी उत्सव समिती अध्यक्ष सुरेश पाटोळे, विद्यमान अध्यक्ष शांतीलाल साबळे, सतीश बगाडे, विश्वानाथ पाटोळे,,रजनी डोलारे,विकास डोलारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत होती
सोलापूर शहरात दरवर्षी १ ऑगस्टपासून साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. सन १९९४ पासून सुरू झालेला हा सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक प्रबोधनाचा उपक्रम मागील ३० वर्षांपासून समाजात भरीव योगदान देत आहे. मागील १० वर्षापासून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीची परवानगी रात्री बारापर्यंत वाढवून देण्यात यावी ही मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी मा. राजेंद्र भोसले साहेब यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करून सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालय यांच्याकडे पाठवला आहे. तो प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे. अद्याप यावर पुढील कारवाई झाली नाही. यावेळी देखील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने यापूर्वी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे मिरवणूक परवाना रात्री १२:०० वाजेपर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे. त्यांनी याबाबत मान्यता दिली आहे.
या वर्षी या उत्सवाची सांगता रविवारी दि ३ ऑगस्ट रोजी भव्य मिरवणुकीच्या संचलनाने केली जाणार आहे . सुमारे ६० मंडळे आकर्षक देखाव्यांसह या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दरवर्षी प्रमाणे मिरवणुकीसाठी रात्री १०:०० वाजेपर्यंतच परवानगी दिली गेली,तर वेळेअभावी अनेक मंडळांना मिरवणूक अपूर्ण ठेवावी लागेल. देखावे पाहण्यासाठी कुटुंबासह सोलापूर शहर व परिसरातून आलेल्या नागरिकांचा हिरमोड होईल.तरी वाढलेली मंडळांची संख्या, वाढत असलेला लोकसहभाग या बाबी ध्यानात घेऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीचा परवाना रात्री बारापर्यंत वाढवून द्यावा ही मागणी मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळाकडून मा,पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकडे करण्यात आली.



