समाजाच्या विकासासाठी पत्रकारांचे योगदान मोठे आहे…राजन पाटील यांचे प्रतिपादन
सेवानिवृत्तीबद्दल कृष्णकांत चव्हाण यांचा सत्कार संपन्न...

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकारांची भूमिका आणि योगदान महत्त्वाचे असते. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी केले.
बुधवारी सायंकाळी शिरापूर तालुका मोहोळ येथे दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक कृष्णकांत चव्हाण यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शिरापूरकरांच्या वतीने मारुती मंदिरात नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटील बोलत होते. या कार्यक्रमास मोहोळ पंचायत समितीचे सभापती अस्लम चौधरी, उत्तर पंचायत समितीचे उपसभापती सुनील भोसले,नरखेड जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे, शिरापूर पंचायत समिती सदस्य नीलम मसलकर, नवनाथ मसलकर, माजी प. स. सदस्य सज्जनराव पाटील शिरपूरचे माजी सरपंच सागरराजे पांढरे, सुजाता राजेपांढरे, मीनाक्षी चव्हाण, मेघा चव्हाण, राधिका दुधगीकर,किशोर दुधगीकर, पत्रकार चंद्रकांत देवकते, महेश पांढरे, विजयकुमार चव्हाण , डीवायएसपी शहाजी शिंदे, ह. भ. प.अशोक काळे, बाळासाहेब हारदाडे, अमोल सावंत, आदी उपस्थित होते.
गावच्या, भागाच्या सर्वांगीण विकासासाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कृष्णकांत चव्हाण यांनी गावच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे अशी माणसं समाजकारणात, राजकारणात पुढे येणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी आता सक्रिय राजकारणात उतरण्यास कसलीच हरकत नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी अस्लम चौधरी, लखन शिंदे ,सुनील भोसले,सज्जन पाटील, ब्रह्मदेव गोपने, तसेच काही गावकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कारला उत्तर देताना कृष्णकांत चव्हाण यांनी मी नोकरीतून निवृत्त झालो असलो तरी समाजकार्यातून कधीच निवृत्त होणार नाही, अखेरच्या श्वासापर्यंत मी गावची, समाजाची आणि संकटात सापडलेल्यांची मदत करेन असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या हस्ते कृष्णकांत चव्हाण यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फंटू गोफणे यांनी केले. तर आभार वसुदेव चव्हाण यांनी मानले



