शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. सुभाष देशमुख सरसावले; दक्षिणमधील विविध सिंचन प्रकल्पांबाबत जलसंपदा मंत्र्यांसोबत चर्चा

मुंबई येथील मंत्रालयात आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित जलसंपदा प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूरमधील शेतकरी आणि नागरिकांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या मंत्री महोदयांसमोर मांडल्या.
यामध्ये सीना नदीवरील नंदूर येथील बंधाऱ्याची विशेष दुरुस्ती, नंदूर–अकोले (मंद्रूप) दरम्यान हायलेव्हल बॅरेज, उजनीचे पाणी विविध तलावांमध्ये नियमित सोडणे, भीमा–सीना नदी जोडकालवा (बोगदा क्र.२), वडापूर बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर, फताटेवाडी पंपहाऊस व होटगी पाईपलाईन अशा अनेक सिंचन प्रकल्पांचा समावेश होता.
तसेच देगाव, प्रतापनगर-सोरेगाव, कुमठे, सलगरवाडी परिसरातील शेतकऱ्यांना जमीन संपादनावेळी योग्य मोबदला, पुरामुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांची तातडीची दुरुस्ती, कालव्यांच्या सेवा रस्त्यांची दुरुस्ती, वंचित क्षेत्रांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे, तसेच भीमा आणि सीना नदीकाठच्या गावांसाठी पुरप्रतिबंधक उपाययोजना या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विषयांची सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले.
या बैठकीमुळे दक्षिण सोलापूरच्या सिंचन, जलसंपदा आणि शेतकरी हिताच्या विकासकामांना मोठी गती मिळणार आहे



