मुंबई-वडोदरा महामार्गावर ट्रकने चिरडले, वडिलांच्या कुशीत सोडला चिमुकल्याने प्राण

राहुल पाटील, पालघर, 22 डिसेंबर : मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामासाठी माती भरावासाठी लागणारा मुरूम मोठ्या ट्रकने वाहून नेला जातो.
केळठण येथे भरधाव ओव्हरलोड ट्रकने पिता पुत्राला चिरडल्याची घटना घडलीय. असून यात चिमुकल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचे वडील गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात साहिल वड या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून वडील सचिन वड हे गंभीर जखमी आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आज दिवसभरातील मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारण्यासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या दोन वेगवेगळ्या ट्रक कडून हा झालेला दुसरा अपघात आहे.
पहाटे मस्तान येथे झालेल्या अपघातात रवी दळवी याचा जागीच मृत्यू झाला. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम सध्या पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आले आहे. या कंपन्यांनी ग्रामीण भागातील माती आणि मुरूम भरावासाठी जोमात खोदकाम सुरू केल आहे. मात्र वाहतूक करताना या ट्रक चालकांकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत.
ओवरलोड , ओवर स्पीड तसच ग्रामीण भागातील लहान रस्त्यांवर देखील भरधाव वेगात चालणाऱ्या ट्रकमुळे अनेक अपघात झालेत. मात्र स्थानिक पोलीस प्रशासन , महसूल विभाग आणि आरटीओ विभाग अपघातांकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. या महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू असतानाच अवघ्या तीन ते चार महिन्यातच चार ते पाच बळी गेले असून प्रशासनाला जाग कधी येणार असा सवाल येथील स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय