आघाडीपुढे समस्या निर्माण होतील असे बोलू नका – नाना पटोले

महाविकास आघाडीमध्ये सध्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा सुरू आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पक्षाचे 19 खासदार लोकसभेत राहतील, असे विधान केल्यामुळे आघाडीत बेबनाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर तीव्र हरकत नोंदवत राऊतांना आघाडीपुढे समस्या निर्माण होतील, असे बोलणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत
लोकसभेत आमच्या पक्षाचे 19 खासदार असतील, असा दावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 4, तर काँग्रेसने 1 जागा जिंकली. या जागा त्यांच्याकडेच राहतील. जिंकल्यानंतर कोण कुठे गेला यावर जागावाटप ठरणार नाही. दादरा नगर हवेलीचा एक खासदार आमचा आहे. महाराष्ट्रात आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या. अशा एकूण 19 खासदार आमचे लोकसभेत राहतील, असे राऊत म्हणाले होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली हरकत
संजय राऊत यांच्या या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र हरकत घेतली. तसेच आघाडीत-बिघाडी होईल असे कोणतेही विधान करू नका, असा त्यांना इशारावजा सल्लाही दिला. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा अद्याप कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. त्यावर चर्चाही झाली नाही. या प्रकरणी तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी 3 नेत्यांची 9 सदस्यीय समिती स्थापन करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
जागा लढण्यापेक्षा अधिकाधिक जागा कशा जिंकल्या जातील यावर चर्चा व्हावी अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे अशा पद्धतीची विधाने करून महाविकास आघाडीच्या प्रस्तावित रणनीतीमध्ये समस्या निर्माण करू नये असे आमचा त्यांना सल्ला आहे, असेही नाना पटोले यावेळी खासदार संजय राऊत यांना उद्देशून म्हणाले.
शरद पवारांचे केले समर्थन
पटोले यांनी यावेळी प्रत्येक पक्षाला आपापली तयारी करण्याचा अधिकार असल्याचेही स्पष्ट केले. त्यांनी यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानाचे समर्थन केले. प्रत्येक पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली तर त्यात वावगे काहीच नाही. काँग्रेसही आपले काम करत आहे. यासंबंधीची सर्व चाचपणी सुरू आहे, असे पटोले म्हणाले.