महाराष्ट्रातील मदरसे-मशिदींतील परप्रांतीय मौलानांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा…
महाराष्ट्रातील मौलानांनी केली मागणी...

सोलापूर :राज्यातील मदरसे आणि मशिदींमध्ये कार्यरत असलेल्या परप्रांतीय मौलानांची सखोल चौकशी करून आवश्यक त्या प्रकरणांमध्ये त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी सोलापूर येथील एकता बहुउद्देशीय संस्थेच्या मौलानांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत एकता बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे मौलाना अताऊल्ला पटेल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं.एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली.
*परप्रांतीय मौलानाची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा –
उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह विविध राज्यांतून महाराष्ट्रात आलेले काही मौलाना मदरसे आणि मशिदींमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे मौलाना अताऊल्ला पटेल यांनी सांगितले. त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया, कार्यपद्धती आणि पार्श्वभूमीची सखोल पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी पटेल यांनी केली आहे. काही परप्रांतीय मौलानांकडून समाजात तेढ निर्माण करणे, अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे तसेच मदरशां मधील विद्यार्थ्यांच्या शोषणासारख्या घटना घडल्याचे आरोप केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मदरसे आणि मशिदींमध्ये कार्यरत असलेल्या परप्रांतीय मौलानांची चौकशी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.



