सोलापूरचे नेतृत्व प्रणितीं कडे आलं

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीच्या प्रणिती शिंदे या 75 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांचं अभिनंदन. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती. उशिरा उमेदवारी जाहीर झाली तरीदेखील भाजपची बूथ पर्यंतची यंत्रणा, राज्यात आणि केंद्रात असलेली सत्ता या सर्वांमुळे कमी कालावधीतही त्यांनी जोरदार प्रचार केला.
भारतीय जनता पार्टीने गेल्या दोन टर्ममध्ये दिलेल्या उमेदवारांमुळे स्थानिक पातळीवर लोकांमध्ये भाजपचा आणखी एक लादलेला उमेदवार अशी भावना सातपुतेंच्या बाबतीत झाली होती.ती पुसण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला फारसं यश आलं नाही.या मतदारसंघांमध्ये 12 लाख इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे लागोपाठ दोन वेळा पराभूत झाले. या दोन्ही वेळी जवळपास दीड लाखाचं मताधिक्य भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मिळालं होतं. प्रणिती शिंदे या 75 हजार मतांनी निवडून आल्या आहेत. म्हणजे दीड लाखाचं काँग्रेस आणि भाजप मधील असलेलं अंतर प्रणितींनी तोडलं. याचबरोबर आणखीन 75 हजार मतं जास्त मिळवली. म्हणजे जवळपास सव्वा दोन लाख मत काँग्रेसकडे वाढली आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मतदानाच्या आकडेवारीत मध्य मध्ये अपेक्षित आघाडी प्रणिती यांना मिळालेली नाही. केवळ 800 मतांचा मताधिक्य त्यांना आहे. या उलट पंढरपूर-मंगळवेढा, मोहोळ मतदारसंघात अपेक्षेपेक्षा जास्त मताधिक्य प्रणिती शिंदे यांना मिळालं आहे. सोलापूर मध्य आणि दक्षिण विधानसभा कार्यक्षेत्रात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. यंदा मुस्लिम समाजानं एकत्रित येऊन प्रणिती यांना पाठिंब्याचा निर्णय घेतला. मतदानाच्या वेळी एक गठ्ठा मतदान, हिरहिरीने मतदान असं दृश्य अनेक मोहोल्यात दिसून आलं. सोलापूरची निवडणूक विकासाच्या मुद्द्यापेक्षा जातीय आणि धार्मिक मुद्द्यांकडे आकर्षली गेली. तसं पाहता हे शहराचं दुर्दैवच म्हणावं लागेल. एक समाज एकत्र झाला की दुसरा समाज दुसर्या बाजूला एकत्र होतो. याचे चित्र या निवडणूक निमित्ताने अनेकांनी अनुभवलं. दोन्ही बाजूंनी असं वळण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला हे ही नक्कीच आहे. असो आता निवडणूक झाली आहे. सोलापूरचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तरुण खासदार प्रणिती शिंदे या प्रयत्न करतील. त्यांना सोलापूर शहर जिल्ह्याचे बरेचसे प्रश्न माहीत आहेत. त्यांनी गेल्या दहा वर्षात वारंवार भाजप, केंद्र, राज्य आणि महापालिका नेतृत्वावर टीकाटिप्पणी केली आहे. आता जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. त्यांनी आता इतर सरकारांना, व्यक्तींना दोष देऊन चालणार नाही. लोक ते खपूनही घेणार नाहीत. वाद घालण्यापेक्षा, एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा प्रणिती या कृतीवर भर देतील अशी जनतेची अपेक्षा आहे. शेतकर्यांचे आणि शहरी भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न प्राधान्य क्रमाने घ्यावेत. सोलापूरचे विमानतळ बोरामणी की होटगी असे वादाचे मुद्दे टाळून दोन्हीकडेही विमानतळ व्हावं आणि ते लवकरात लवकर व्हावं असा निर्णय प्रणितीं कडून लोकांना अपेक्षित आहे. बेरोजगारीचाही प्रश्न सोलापूर जिल्ह्यात मोठा आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्ह्याचे ,शहराचा, अनेकदा नेतृत्व केलं.त्यांच्या कारकिर्दीत मोठा उद्योग सोलापूरला यावा अशी सोलापूरच्या तरुणाईची अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नाही. प्रणितीं यांनी ती पूर्ण करावी अशाही अपेक्षा आहेत. काम करणार्यांकडून लोक अपेक्षा करतात. कोणी दुखावेल, कुणी समाज नाराज होईल असे मुद्दे ठेवू नये. पुढच्या निवडणुकीला तब्बल पाच वर्षे आहेत. त्या वेळचे प्रश्न, त्या वेळचे वातावरण वेगळे असते. कुणाची मर्जी सांभाळणं खुश करणं या दबावात गुंतून पडू नये. शहर मध्य मध्ये लोकांनी प्रणितींचं काम,जनसंपर्क अनुभवल आहे. का कोणास ठाऊक? एवढं चांगल्या पद्धतीचे काम असूनही त्यांच्या मतदारसंघात त्यांना लीड मिळालं नाही? निवडणुकीचे हेवेदावे, मुद्दे बाजूला, पण आता त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे केंद्रात लीड करावं. सोलापूरचे प्रश्न केंद्र राज्यस्तरावर मांडावेत सोडून घ्यावेत निधी आणावा. नव्या इनिंगसाठी त्यांना शुभेच्छा….