संस्कारक्षम पिढीच देशाला चांगले नेतृत्व देवू शकेल – पत्रकार दशरथ वडतिले यांचा विश्वास.आयटीआयच्या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन…

सोलापूर – राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तयार झालेली संस्कारक्षम तरुण तडफदार पिढीच समाजाच्या व देशाच्या सर्वांगीण विकासाला गती व सक्षम नेतृत्व देवू शकेल,असा ठाम विश्वास सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी व्यक्त केला. सोलापूरच्या विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन सोमवार दिनांक ३मार्च रोजी झाले,त्यावेळी ते बोलत होते.संस्थेचे उपप्राचार्य एस. एस. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करमणूक कर अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा ओसवाल व सामाजिक कार्यकर्त्या प्रितीताई उडानशिव ह्या उपस्थित होत्या.प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी एन. एस.म्हेत्रे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तर व्ही.डी.भांगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.एस.आर.गोलेकर यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला.पी.एम.केंदळे यांनी सूत्रसंचालन केलेल्या कार्यक्रमात बी. आर.आसरेड्डी यांनी आभार मानले.अध्यक्षीय भाषणात झनझने यांनी श्रमाचे महत्व पटवून देवून विद्यार्थांना सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात झोकून देण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून प्रगती करताना सामाजिक कार्याचे भान ठेवावे,असे आवाहन तहसीलदार ओसवाल यांनी केले.प्रितिताई उडानशिव यांनी या शिबिरास हार्दिक शुभेच्छा दिल्या.पत्रकार दशरथ वडतिले यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजना हा सामाजिक कार्याचा भक्कम पाया असून त्यातूनच विद्यार्थांचे नेतृत्वगुण व आत्मविश्वास निर्माण होत असतो,असे सांगितले.हे पाच दिवसीय शिबीर त्याच संस्थेत चालणार आहे.शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी श्रमदानातून मैदान व आवार स्वचछता,रंगकाम, पाईप फीटिंग,विद्युत दुरुस्ती,वृक्षारोपण,स्क्रॅप विल्हेवाट आदी कामे करणार आहेत.तसेच या शिबिरात विद्यार्थांची आरोग्य तपासणी व प्रबोधन केले जाणार जाणार असून त्यासाठी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.