जरांगेंना भेटायला आलेल्या शिष्टमंडळातील मुख्यमंत्र्यांच्या खास मानसाला आली भोवळ

मुंबई, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे, मराठा बांधवांचं वादळ आज मुंबईच्या वेशीवर अर्थात वाशीमध्ये धडकलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
सरकारच्या शिष्टमंडळानं आज पुन्हा एकदा मनो जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र याचदरम्यान शिष्टमंडळातील प्रतिनिधी मंगेश चिवटे यांना भोवळ आल्याची घटना घडली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मोर्चा हा वाशीमध्ये दाखल झाला आहे. हा मोर्चा मुंबईमध्ये न येऊ देण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. याच पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून, आज सकाळीच सरकारचं शिष्टमंडळ मनो जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी वाशीत दाखल झालं. मात्र प्रचंड गर्दी आणि उन्हाचा त्रास सहन न झाल्यानं मंगेश चिवटे यांना भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील यांनी चर्चा केली आहे. ते आता थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मराठा आरक्षणावर तोडगा काढता आला नाही. त्यामुळे 24 डिसेंबरच्या एक दिवस आधीच 23 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये इशारा सभा घेतली होती. या सभेमध्येच त्यांनी 20 जानेवारीला अंतरवालीसराठीमधून मुंबईच्या दिशेन निघणार असल्याची घोषणा केली होती. आता हा मोर्चा वाशीमध्ये पोहोचला आहे. वाशीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहे.