प्रेम वाटणाऱ्या सणांना द्वेषाचे प्रतीक होऊ देणार नाही – पैगंबर शेख

सण हे लोकांन लोकांशी जोडण्याचे माध्यम आहेत, आनंद वाटण्याचे साधन आहेत. कुठल्या तरी एखाद्या कारणासाठी लोक एकत्र येतात, आपापसातील वाद विसरण्याचा आणि हसतमुखाने एकमेकांशी या निमित्ताने पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. हे प्रत्येकच सणात प्रकर्षाने जाणवून येते. सणांमुळे कित्येक महिने न बोललेली लोकं एकमेकांशी निदान शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने का होईना बोलतात. सणाच्या निमित्ताने एकमेकांना सहकार्य करतात. होळी आणि धुलिवंदन हा असाच माणसाला माणसाशी वेगवेगळ्या रंगांची उधळण करून जोडणारा सण आहे. मला हा सण लहानपणापासूनच आवडतो. याचे कारण हा सण कुठल्याही एका रंगाचे उदात्तीकरण करत नाही. हा सण सर्व रंग आपलेच ही भावना माणसाच्या मनात निर्माण करतो. ते सर्वच रंग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या दिवशी दिसून येतात.
पण काहीजण या सणाला गालबोट देखील लावण्याचा प्रकर्षाने प्रयत्न करतात. त्यांना ते काय करत आहेत याची जाणीव नसते. काल उत्तरप्रदेश मध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला आहे. एक मुस्लिम तरुण आणि दोन महिला गाडीवर एका परिसरातून जात असताना त्यांना थांबवून तिथे होळी खेळणाऱ्या मुलांनी त्यांच्या तोंडाला रंग लावला आणि अंगावर पाणी टाकले. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात ही घटना वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. मलाही बऱ्याच जणांनी कालपासून याचे व्हिडिओ पाठवले आहेत. आणि जणू काही संपूर्ण देशभर असेच घडत आहे की काय असे वातावरण वास्तवात नाही मात्र लोकांच्या मस्तकात निर्माण केले जात आहे. डोकी भडकली की अशा अजून काही घटना घडायला किती वेळ लागणार आहे ?
मुळात आपण किती चुकतो हे आपल्याला तरी समजत आहे का ? या घटनेची फक्त माध्यमांना बातमीच द्यायची आहे का ? माध्यमांची यावर प्रबोधनपर भुमीका काहीच नाही का ? मला या सर्व गोष्टींची लाज वाटते. आय मिन मी आणि माझ्यासारखे अनेक जण द्वेष थांबवण्याचा खूप प्रयत्न करतोय. पण माध्यमे आम्हाला सहकार्य करत नाहीत. सतत द्वेष पसरवणाऱ्या लोकांना ही माध्यमे फुटेज देतात. पण आमच्या सारख्या लोकांची खूपच एलर्जी आहे. उत्तरप्रदेशच्या बिजनोर मधील घटना म्हणजे देश आहे का ? खरच सांगा. १४० कोटी लोकसंख्या असलेला भारत त्यात उत्तरप्रदेश मध्ये घडलेली एक घटना किंवा अशा १० घटना घडणे म्हणजे देश आहे का ? जे लोक चांगल्या पद्धतीने हा रंगाचा सण साजरा करतात. त्याला तुम्ही देश म्हणणार नाही का ? हा प्रश्न आहे.
मागील आठवड्यात उत्तरप्रदेशच्या बदायु मध्ये दोन मुलांच्या हत्येची घटना घडली त्याहीवेळी असेच झाले. माध्यमांनी द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने बातमी दिली. आणि सबंध मुस्लिम समाज आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाला. जणूकाही २० कोटींपेक्षा जास्त मुस्लिमांनी त्याची जबाबदारीच घेतली आहे. आपण किती हलक्या मानसिकतेचे झालेलो आहोत हे यावरून लक्षात येते. मला वाटते आपण दिवसागणिक या बाबतीत खालची पातळी गाठत आहोत. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी मीडियाच्या माध्यमातून उच्चशिक्षित लोक करत आहेत. यांनी शिकूनही देशाला काय फायदा झाला बरं ?
मला वाटते त्या चाळीतून मुस्लिम कुटुंब न जाता हिंदू कुटुंब जरी गेले असते तरीही त्यांना याच पद्धतीने त्या तरुणांनी रंग लावला असता. बहुदा त्यांनी हर हर महादेव आणि जय श्री रामच्या घोषणा नसत्या दिल्या. ज्यात उन्माद भरलेला होता. पण रंग मात्र निश्चितच लावला असता. मीही त्या तरुणांचाच एक भाग काही वर्षांपूर्वी होतो. पण काही लोकांना खरेच रंग लावून घ्यायला आवडत नाही हे समजले आणि त्या गोष्टी बंद केल्या. आपण जर सण प्रेमाचा संदेश देण्यासाठी साजरा करतोय तर काही लोकांना हा रंग न लावून प्रेमाचा संदेश देण्यात काय हरकत आहे ? यात धर्माचा संबंध नाही. कित्येक असे हिंदू आहेत ज्यांना रंग लावून घ्यायला आवडत नाही. तेही समजून घेणे गरजेचे. काही ठिकाणी या रंग लावण्यावरून कित्येकदा भांडणे झालेली मी पाहिली आहेत. ज्यात मुस्लिम कुठेच नसतात.
बर, रंग लावल्याने इस्लाम देखील धोक्यात येत नाही. त्यामुळे ‘अपनेमे रंग नई लगाते’ अशी शिकवण कोणाला देण्याच्या भानगडीत देखील पडून नका. या सगळ्या मानसिकतेमुळे समाजात विसंवाद वाढतो. माझा आज रोजा आहे. तरीही मी आज धुलिवंदन खेळलो. केवळ मीच नाही तर माझे संपूर्ण कुटुंब धुलिवंदन खेळले. मी नेहमीच सांगतो आपण मिश्र संस्कृतीत राहतो. ती मिश्र संस्कृती म्हणजे काय तर हेच. धुलिवंदनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा…🎨
प्रेमाचा रंग उधळून द्वेषाचे राजकारण संपवुयात
सणांना द्वेषाचे प्रतीक बनण्यापासून थांबवूयात…
#समजलंतरठीक
– पैगंबर शेख
पुणे, महाराष्ट्र
९९७००७०७०५