सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

भारतीय राज्यघटनेचे प्रत्यके पान हे सामाजिक न्यायाचे: डॉ. जगन कराडे

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भविष्यातील भारत कसा असेल, याचे संपूर्ण नियोजन हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले होते. त्यामुळे भारतीय राज्यघटनेत देशातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. राज्यघटनेचे प्रत्येक पान हे सामाजिक न्यायाचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जगन कराडे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्यावतीने प्रजासत्ताक दिन आणि ‘संविधान अमृतमहोत्सवी वर्ष’ याचे औचित्य साधून ‘अमृतमोहत्सवी भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीचा प्रवास’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. कराडे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक डॉ. गौतम कांबळे यांनी अध्यासन केंद्राची विस्तृत माहिती दिली. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर तंबाखू विरोध आणि कुष्ठरोग मुक्त भारत या बाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. याचे वाचन कुलसचिव योगिनी घारे यांनी केले.

डॉ. कराडे म्हणाले की, भारतातील उदासीन, वंचित वर्गाला राज्यघटनेच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. भारतीय राज्यघटना ही सामाजिक दस्ताऐवज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना निर्मित समता प्रस्थापित करणे, प्रत्येक घटकाच्या हक्काचे आणि अधिकाराचे संरक्षण करणे, याला प्राधान्य दिले आहे. भावी पिढीच्या कल्याणासाठी  लोकशाहीचा अणि राज्यघटनेचा गौरव आणि अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. कराडे यांनी यावेळी केले.

कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जगात सर्वात मोठी लोकशाही आणि संविधान भारतात असून त्यानुसार आपल्या देशाची प्रगती सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प अभियान अंतर्गत पुस्तक परीक्षण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या प्रजन्या अंजुटगी, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या अंजली लांडगे आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या वैष्णवी चव्हाण या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानले.

फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रजासत्ताक दिन आणि ‘संविधान अमृतमहोत्सवी वर्ष’ याचे औचित्य साधून डॉ. जगन कराडे यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राजाभाऊ सरवदे व डॉ. गौतम कांबळे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel