अवकाळीमुळे नुकसान झालेला शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचा आदेश

27 नोव्हेंबर, अजित मांढरे : राज्यात अनेक ठिकाणी गारपीटीसह पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. बळीराजा हवालदील झाला आहे. पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडं लागले आहेत.
पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं आहे, त्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शासनाला प्रस्ताव सादर करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान राज्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील अनेक भागांत गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘अवकाळी पावसासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. कुठे किती नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल घेऊन पाठवण्याचा सूचना दिल्यात. निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा मदत मिळावी अशीच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीकं वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्यामुळे जिथे नुकसान होईल तिथे मदत मिळेल असं’ फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अवकाळीचा फटका
राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसासोबतच गारपीट देखील झाली आहे. या गारपिटीचा मोठा फटका ज्वारी, गहू, हरभारा अशा रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. सोबतच ढगाळ वातावरणामुळे तुरी सारख्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. खरीप हंगामात देखील पावसामुळे असमान प्रमाणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. आता अवकाळीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.