सोलापुरात सीना नदीच्या महापुरात लग्नाचं स्वप्न उद्ध्वस्त – आईचा आक्रोश, आमदार-खासदार गायब….

सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला महापूर : मुलीच्या लग्नाचं साहित्य पाण्यात बुडालं, आईचा आक्रोश – “ना आमदार आले, ना खासदार, प्रशासनानेही घेतली नाही दखल”
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला आहे. परिणामी सोलापूर जिल्ह्यातील तिर्हे गावासह अनेक गावात घरांमध्ये पाणी शिरले असून शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लोकांच्या घरातील धान्य, कपडे, जनावरे व लग्न-उत्सवाचे साहित्य पाण्यात वाहून गेले आहे.
लोकप्रहार न्यूज नेटवर्कची टीम तिर्हे गावात पोहोचली असता, गावातील एका शेतमजुरी करणाऱ्या आईने डोळ्यात पाणी आणून सांगितले की –
“माझ्या मुलीचं लग्न 30 ऑक्टोबरला आहे. थोडं-थोडं करून मी सामान जमवलं होतं. लग्नासाठी आणलेलं सर्व साहित्य आता पाण्यात भिजून गेलं. माझा नवरा अपंग आहे. मीच शेतमजुरी करून घर चालवते. इतक्या कष्टाने जपून ठेवलेलं सर्व काही महापुराने वाहून नेलं. पण आमच्या गावात आजवर ना एकही आमदार आला, ना खासदार. प्रशासनही फक्त कागदोपत्री मदत दाखवते. प्रत्यक्ष मदत मात्र मिळालेली नाही.”
तिने सरकारकडे आक्रोशाने मागणी केली की, “माझ्या मुलीच्या लग्नासाठी साहित्याची भरपाई द्या. आम्हाला खऱ्या अर्थाने मदत द्या. निवडणुकीच्या वेळी मतं मागायला सगळे येतात, पण आमच्या संकटाच्या काळात कोणीच येत नाही.”
गावातील नागरिकांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. महापूरामुळे गावात लोक अडचणीत आहेत, घरे उद्ध्वस्त झाली आहेत, पिण्याच्या पाण्याचा व अन्नधान्याचा तुटवडा आहे. तरीसुद्धा निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी आजपर्यंत गावात येऊन परिस्थितीचा आढावा घेतलेला नाही.
पूरस्थितीमुळे नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. गावकऱ्यांचा संताप उफाळून येत असून त्यांची एकच मागणी आहे – “संकटाच्या काळात आमच्यासोबत उभे राहा, अन्यथा मतांची अपेक्षा ठेवू नका.”



