विद्यार्थी मित्रांनो, यश हे मागून मिळत नसते; ते कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या बळावर मिळवावे लागते : खासदार प्रणिती शिंदे

मंगळवेढा येथील महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने मा. दत्तात्रय तात्यासाहेब खडतरे यांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त तसेच मंगळवेढा तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांतील दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांच्या सत्काराचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बी. पी. रोंगे सर होते. तसेच संजय कट्टे सर, महादेव माळी सर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी दहावी-बारावीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या दत्तात्रय तात्यासाहेब खडतरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, दहावी आणि बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून पुढील संपूर्ण जीवनाची दिशा या टप्प्यावर ठरत असते. पूर्वी विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान असे मर्यादित पर्याय उपलब्ध होते; मात्र आज बदलत्या काळात विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य दिशा निवडून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
“यश मागून मिळत नाही, ते मेहनतीच्या बळावर मिळवावं लागतं,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, चिकाटी आणि आत्मविश्वास ठेवण्याचे आवाहन केले. शिक्षक तसेच आई-वडील हेच खरे मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनातूनच जीवनात यशाचे शिखर गाठता येते, असेही त्यांनी नमूद केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर यश संपादन करता येते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.
आज सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन केले असून हा सन्मान त्यांच्या मेहनतीची पावती असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कार्यक्रमाचे आयोजक आणि संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठे प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर लीक होणे हे सरकारचे मोठे अपयश असल्याची टीका केली. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारांमुळे, बेरोजगारीमुळे, सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे तरुणांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक संघटित होत सरकारला जाब विचारत आहेत, क्राकरोज जनता पार्टीच्या बॅनरखाली देशातील तरुणाईचा व्यवस्थेविरोधात नवा आवाज उभा राहत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकशक्ती एकवटत आहे. जगभरातील अनेक चळवळींनी या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणल्याचे दिसून आले आहे, असेही खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
याकार्यक्रमास कविता खडतरे, शनेश्वर भडंगे, विलास गवळी, दत्तात्रय डांगे, नाथाजी कांबळे, अश्विनी गवळी, संकेत माने, तेजस झेंडे, सोहम खडतरे, आत्माराम गवळी, अनिता कांबळे, सुभाष कांबळे, नवनाथ सपताळे, सुखदेव शिंदे, नंदू शिंदे, माणिक गुंगे, संदीप पवार, भगवान कांबळे, संजय खडतरे, रामा सपताळे, सिद्धनाथ कांबळे, सिंगण्णा पाटील, भारत रायबान, मोहन शिंदे, मधुकर भडंगे, संभाजी गवळी, सुनील सोनवणे, राजेंद्र नलावडे, शिवाजी कांबळे, लक्ष्मण गळवे, अर्चना सलगर, संभाजी सलगर, भारत रायबान यांच्यासह पालक, शिक्षक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



